Samas 1
समास 1 - समास पहिला : निस्पृहलक्षणनाम
समास 1 - दशक १४
समास पहिला : निस्पृहलक्षणनाम
॥ श्रीराम ॥
ऐका स्पृहाची सिकवण । युक्ति बुद्धि शाहाणपण ।
जेणें राहे समाधान । निरंतर ॥ १ ॥
सोपा मंत्र परी नेमस्त । साधें वोषध गुणवंत ।
साधें बोलणें सप्रचित । तैसें माझें ॥ २ ॥
तत्काळचि अवगुण जाती । उत्तम गुणाची होये प्राप्ती ।
शब्दवोषध तीव्र श्रोतीं । साक्षपें सेवावें ॥ ३ ॥
निस्पृहता धरूं नये । धरिली तरी सोडूं नये ।
सोडिली तरी हिंडों नये । वोळखीमधें ॥ ४ ॥
कांता दृष्टी राखों नये । मनास गोडी चाखऊं नये ।
धारिष्ट चळतां दाखऊं नये । मुख आपुलें ॥ ५ ॥
येकेस्थळीं राहों नये । कानकोंडें साहों नये ।
द्रव्य दारा पाहों नये । आळकेपणें ॥ ६ ॥
आचारभ्रष्ट होऊं नये । दिल्यां द्रव्य घेऊं नये ।
उणा शब्द येऊं नये । आपणावरी ॥ ७ ॥
भिक्षेविषीं लाजों नये । बहुत भिक्षा घेऊं नये ।
पुसतांहि देऊं नये । वोळखी आपली ॥ ८ ॥
धड मळिन नेसों नये । गोड अन्न खाऊं नये ।
दुराग्रह करूं नये । प्रसंगें वर्तावें ॥ ९ ॥
भोगीं मन असों नये । देहदुःखें त्रासों नये ।
पुढें आशा धरूं नये । जीवित्वाची ॥ १० ॥
विरक्ती गळों देऊं नये । धारिष्ट चळों देऊं नये ।
ज्ञान मळिण होऊं नये । विवेकबळें ॥ ११ ॥
करुणाकीर्तन सोडूं नये । अंतर्ध्यान मोडूं नये ॥
प्रेमतंतु तोडूं नये । सगुणमूर्तीचा ॥ १२ ॥
पोटीं चिंता धरूं नये । कष्टें खेद मानूं नये ।
समैं धीर सांडूं नये । कांहीं केल्या ॥ १३ ॥
अपमानितां सिणों नये । निखंदितां कष्टों नये ।
धिःकारितां झुरों नये । कांहीं केल्या ॥ १४ ॥
लोकलाज धरूं नये । लाजवितां लाजों नये ।
खिजवितां खिजों नये । विरक्त पुरुषें ॥ १५ ॥
शुद्ध मार्ग सोडूं नये । दुर्जनासीं तंडों नये ।
समंध पडों देऊं नये । चांडाळासी ॥ १६ ॥
तपीळपण धरूं नये । भांडवितां भांडों नये ।
उडवितां उडऊं नये । निजस्थिती आपुली ॥ १७ ॥
हांसवितां हासों नये । बोलवितां बोलों नये ।
चालवितां चालों नये । क्षणक्ष्णा ॥ १८ ॥
येक वेष धरूं नये । येक साज करूं नये ।
येकदेसी होऊं नये । भ्रमण करावें ॥ १९ ॥
सलगी पडों देऊं नये । प्रतिग्रह घेऊं नये ।
सभेमध्यें बैसों नये । सर्वकाळ ॥ २० ॥
नेम आंगीं लाऊं नये । भरवसा कोणास देऊं नये ।
अंगीकार करूं नये । नेमस्तपणाचा ॥ २१ ॥
नित्यनेम सांडूं नये । अभ्यास बुडों देऊं नये ।
परतंत्र होऊं नये । कांहीं केल्यां ॥ २२ ॥
स्वतंत्रता मोडूं नये । निरापेक्षा तोडूं नये ।
परापेक्षा होऊं नये । क्षणक्ष्णा ॥ २३ ॥
वैभव दृष्टीं पाहों नये । उपाधीसुखें राहों नये ।
येकांत मोडूं देऊं नये । स्वरूपस्थितीचा ॥ २४ ॥
अनर्गळता करूं नये । लोकलाज धरूं नये ।
कोठेंतरी होऊं नये । आसक्त कदां ॥ २५ ॥
परंपरा तोडूं नये । उआपाधी मोडूं देऊं नये ।
ज्ञानमार्गे सोडूं नये । कदाकाळीं ॥ २६ ॥
कर्ममार्ग सांडूं नये । वैराग्य मोडूं देऊं नये ।
साधन भजन खंडूं नये । कदाकाळीं ॥ २७ ॥
अतिवाद करूं नये । अनित्य पोटीं धऊं नये ।
रागें भरीं भरों नये । भलतीकडे ॥२८॥
न मनी त्यास सांगों नये। कंटाळवाणें बोलों नये ।
बहुसाल असो नये । येकें स्थळीं ॥ २९ ॥
कांहीं उपाधी करूं नये । केली तरी धरूं नये ।
धरिली तरी सांपडों नये । उपाधीमध्यें॥ ३० ॥
थोरपणें असो नये । महत्त्व धरून बैसों नये ।
कांहीं मान इछूं नये । कोठेंतरी ॥ ३१ ॥
साधेपण सोडूं नये । सानेपण मोडूं नये ।
बळात्कारें जोडूं नये । अभिमान आंगीं ॥ ३२ ॥
अधिकारेवीण सांगों नये । दाटून उपदेश देऊं नये ।
कानकोंडा करूं नये । परमार्थ कदा ॥ ३३ ॥
कठीण वैराग्य सोडूं नये । कठीण अभ्यास सांडूं नये ।
कठिणता धरूं नये । कोणेकेविशैं ॥ ३४ ॥
कठीण शब्द बोलों नये । कठीण आज्ञा करूं नये ।
कठीण धीरत्व सोडूं नये । कांहीं केल्यां ॥ ३५॥
आपण आसक्त होऊं नये । केल्यावीण सांगों नये ।
बहुसाल मागों नये । शिष्यवर्गांसी ॥ ३६ ॥
उत्धट शब्द बोलों नये । इंद्रियेंस्मरण करूं नये ।
शाक्तमार्गें भरों नये । मुक्तपणें भरीं ॥ ३७ ॥
नीच कृतीं लाजों नये । वैभव होतां माजों नये ।
क्रोधें भरीं भरों नये । जाणपणें ॥ ३८ ॥
थोरपणें चुकों नये । न्याये नीति सांडूं नये ।
अप्रमाण वर्तों नये । कांहीं केल्या ॥ ३९ ॥
कळल्यावीण बोलों नये । अनुमानें निश्चये करूं नये ।
सांगतां दुःख धरूं नये । मूर्खपणें ॥ ४० ॥
सावधपण सोडुं नये । व्यापकपण सांडुं नये ।
कदा सुख मानूं नये । निसुगपणाचें ॥ ४१ ॥
विकल्प पोटीं धरूं नये । स्वार्थआज्ञा करूं नये ।
केली तरी टाकूं नये । आपणास पुढें ॥ ४२ ॥
प्रसंगेंवीण बोलों नये । अन्वयेंवीण गाऊं नये ।
विचारेंवीण जाऊं नये । अविचारपंथें ॥ ४३॥
परोपकार सांडूं नये । परपीडा करूंनये ।
विकल्प पडों देऊं नये । कोणीयेकासी ॥ ४४ ॥
नेणपण सोडूं नये । महंतपण सांडूं नये ।
द्रव्यासाठीं हिंडों नये । कीर्तन करीत ॥ ४५ ॥
संशयात्मक बोलों नये । बहुत निश्चये करूं नये ।
निर्वाहेंवीण धरूं नये । ग्रंथ हातीं ॥ ४६ ॥
जाणपणें पुसों नये । अहंभाव दिसों नये ।
सांगेन ऐसें म्हणों नये । कोणीयेकासी ॥ ४७ ॥
ज्ञानगर्व धरूं नये । सहसा छळणा करूं नये ।
कोठें वाद घालुं नये । कोणीयेकासी ॥ ४८ ॥
स्वार्थबुद्धी जडों नये । कारबारीं पडों नये ।
कार्यकर्ते होऊं नये । राजद्वारीं ॥ ४९ ॥
कोणास भर्वसा देऊं नये । जड भिक्षा मागों नये ।
भिक्षेसाथीं सांगों नये । परंपरा आपुली ॥५० ॥
सोइरिकींत पडों नये । मध्यावर्ति घडों नये ।
प्रपंचाची जडों नये । उपाधी आंगीं ॥ ५१ ॥
प्रपंचप्रस्तीं जाऊं नये । बाष्कळ अन्न खाऊं नये ।
पाहुण्यासरिसें घेऊं नये । आमंत्रणें कदां ॥ ५२ ॥
श्राध पक्ष सटी सामासें । शांती फळशोबन बारसें ।
भोग राहात बहुवसें । नवस व्रतें उद्यापनें ॥ ५३ ॥
तेथें निस्पृहें जाऊं नये । त्याचें अन्न खाऊं नये ।
येळिलवाणें करूं नये । आपणासी ॥ ५४ ॥
लग्नमुहुर्तीं जाऊं नये । पोटासाठीं गाऊं नये ।
मोलें कीर्तन करूं नये । कोठेंतरी ॥ ५५ ॥
आपली भिक्षा सोडूं नये । वारें अन्न खाऊं नये ।
निस्पृहासि घडों नये । मोलयात्रा ॥ ५६ ॥
मोलें सुकृत करूं नये । मोलपुजारी होऊं नये ।
दिल्हा तरी घेऊं नये । इनाम निस्पृहें ॥ ५७ ॥
कोठें मठ करूं नये । केला तरी तो धरूं नये ।
मठपती होऊन बैसों नये । निस्पृह पुरुषें ॥ ५८ ॥
निस्पृहें अवघेंचि करावें । परी आपण तेथें न सांपडावें ।
परस्परें उभारावें । भक्तिमार्गासी ॥ ५९ ॥
प्रेत्नेंविण राहों नये । आळस दृष्टी आणूं नये ।
देह अस्तां पाहों नये । वियोग उपासनेचा ॥ ६० ॥
उपाधीमध्यें पडों नये । उपाधी आंगीं जडों नये ।
भजनमार्ग मोडूं नये । निसंगळपणें ॥ ६१ ॥
बहु उपाधी करूं नये । उपाधीविण कामा नये ।
सगुणभक्ति सोडूं नये । विभक्ति खोटी ॥ ६२ ॥
बहुसाल धांवों नये । बहुसाल साहों नये ।
बहुत कष्ट करूं नये । असुदें खोटें ॥ ६३ ॥
बहुसाल बोलों नये । अबोलणें कामा नये ।
बहुत अन्न खाऊं नये । उपवास खोटा ॥ ६४ ॥
बहुसाल निजों नये । बहुत निद्रा मोडुं नये ।
बहुत नेम धरूं नये । बाश्कळ खोटें ॥ ६५ ॥
बहु जनीं असों नये । बहु आरण्य सेऊं नये ।
बहु देह पाळूं नये । आत्महत्या खोटी ॥ ६६ ॥
बहु संग धरूं नये । संतसंग सांडुं नये ।
कर्मठपण कामा नये । अनाचार खोटा ॥ ६७ ॥
बहु लोकिक सांडुं नये । लोकाधेन होऊं नये ।
बहु प्रीती कामा नये । निष्ठुरता खोटी ॥ ६८ ॥
बहु संशये धरूं नये । मुक्तमार्ग कामा नये ।
बहु साधनीं पडों नये । साधनेंवीण खोटें ॥ ६९ ॥
बहु विषये भोगूं नये । विषयत्याग करितां नये ।
देहलोभ धरूं नये । बहु त्रास खोटा ॥ ७० ॥
वेगळा अनुभव घेऊं नये । अनुभवेंवीण कामा नये ।
आत्मस्थिती बोलों नये । स्तब्धता खोटी ॥ ७१ ॥
मन उरों देऊं नये । मनेंवीण कामा नये ।
अलक्ष वस्तु लक्षा नये । लक्षेंवीण खोटें ॥ ७२ ॥
मनबुद्धिअगोचर । बुद्धीवीण अंधकार ।
जाणीवेचा पडो विसर । नेणीव खोटी ॥ ७३ ॥
ज्ञातेपण धरूं नये । ज्ञानेंवीण कामा नये ।
अतर्क्य वस्तु तर्का न ये । तर्केंवीण खोटें ॥ ७४ ॥
दृश्यस्मरण काम नये । विस्मरण पडों नये ।
कांहीं चर्चा करूं नये । केलियावीण न चले ॥ ७५ ॥
जगीं भेद कामा नये । वर्णसंकर करूं नये ।
आपला धर्म उडऊं नये । अभिमान खोटा ॥ ७६ ॥
आशाबद्धत बोलों नये । विवेकेंवीण चालों नये ।
समाधान हालों नये । कांहीं केल्यां ॥ ७७ ॥
अबद्ध पोथी लेहों नये । पोथीवीण कामा नये ।
अबद्ध वाचूं नये । वाचिल्यावीण खोटें ॥ ७८ ॥
निस्पृहें वगत्रुत्व सांडूं नये । आशंका घेतां भांडों नये ।
श्रोतयांचा मानूं नये । वीट कदा ॥ ७९ ॥
हें सिकवण धरितां चित्तीं । सकळ सुखें वोळगती ।
आंगीं बाणें महंती । अकस्मात ॥ ८० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
निस्पृहलक्षणनाम समास पहिला ॥