Samas 9
समास ९ - समास नववा : राजकारणनिरूपण
समास ९ - दशक १९
समास नववा : राजकारणनिरूपण॥ श्रीराम ॥
ज्ञानी आणी उदास । समुदायाचा हव्यास ।
तेणें अखंड सावकाश । येकांत सेवावा ॥ १ ॥
जेथें तजवीजा कळती । अखंड चाळणा निघती ।
प्राणीमात्राची स्थिती गती । कळों येते ॥ २ ॥
जरी हा चाळणाचि करीना । तरी कांहींच उमजेना ।
हिसेबझाडाचि पाहीना । दिवाळखोर ॥ ३ ॥
येक मिरासी साधिती । येक सीध्या गवाविती ।
व्यापकपणाची स्थिती । ऐसी आहे ॥ ४ ॥
जेणें जें जें मनीं धरिलें । तें तें आधींच समजलें ।
कृत्रिम अवघेंचि खुंटलें । सहजचि येणें ॥ ५ ॥
अखंड राहतां सलगी होते । अतिपरिचयें अवज्ञा घडते ।
याकारणें विश्रांती ते । घेतां नये ॥ ६ ॥
आळसें आळस केला । तरी मग कारबारचि बुडाला ।
अंतरहेत चुकत गेला । समुदायाचा ॥ ७ ॥
उदंड उपासनेचीं कामें । लावीत जावीं नित्यनेमें ।
अवकाश कैंचा कृत्रिमें । करावयासी ॥ ८ ॥
चोर भांडारी करावा । घसरतांच सांभाळावा ।
गोवा मूर्खपणाचा काढावा । हळु हळु ॥ ९ ॥
या अवघ्या पहिल्याच गोष्टी । प्राणी कोणी नव्हता कष्टी ।
राजकारणें मंडळ वेष्टी । चहुंकडे ॥ १० ॥
नष्टासी नष्ट योजावे । वाचळासी वाचाळ आणावे ।
आपणावरी विकल्पाचे गोवे । पडोंच नेदी ॥ ११ ॥
कांटीनें कांटी झाडावी । झाडावी परी ते कळों नेदावी ।
कळकटेपणाची पदवी । असों द्यावी ॥ १२ ॥
न कळतां करी कार्य जें तें । तें काम तत्काळचि होतें ।
गचगचेंत पडतां तें । चमत्कारें नव्हे ॥ १३ ॥
ऐकोनी आवडी लागावी । देखोनी बळकटचि व्हावी ।
सलगीनें आपली पदवी । सेवकामधें ॥ १४ ॥
कोणीयेक काम करितां होतें । न करितां तें मागें पडतें ।
या कारणें ढिलेपण तें । असोंचि नये ॥ १५ ॥
जो दुसयावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला ।
जो आपणचि कष्टत गेला । तोचि भला ॥ १६ ॥
अवघ्यास अवघें कळलें । तेव्हां तें रितें पडिलें ।
याकारणें ऐसें घडलें । न पाहिजे कीं ॥ १७ ॥
मुख्य सूत्र हातीं घ्यावें । करणें तें लोकांकरवीं करवावें ।
कित्तेक खलक उगवावे । राजकारणामधें ॥ १८ ॥
बोलके पहिलवान कळकटे । तयासीच घ्यावे झटे ।
दुर्जनें राजकारण दाटे । ऐसें न करावें ॥ १९ ॥
ग्रामण्य वर्मीं सांपडावें । रगडून पीठचि करावें ।
करूनि मागुती सांवरावें । बुडऊं नये ॥ २० ॥
खळदुर्जनासी भ्यालें । राजकारण नाहीं राखिलें ।
तेणें अवघें प्रगट जालें । बरें वाईट ॥ २१ ॥
समुदाव पाहिजे मोठा । तरी तनावा असाव्या बळकटा ।
मठ करुनी ताठा । धरूं नये ॥ २२ ॥
दुर्जन प्राणी समजावे । परी ते प्रगट न करावे ।
सज्जनापरीस आळवावे । महत्व देउनी ॥ २३ ॥
जनामधें दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटखट ।
याकारणें ते वाट । बुझूनि टाकावी ॥ २४ ॥
गनीमाच्या देखतां फौजा । रणशूरांच्या फुर्फुरिती भुजा ।
ऐसा पाहिजे किं राजा । कैपक्षी परमार्थी ॥ २५ ॥
तयास देखतां दुर्जन धाके । बैसवी प्रचितीचे तडाखे ।
बंडपाषांडाचे वाखे । सहजचि होती ॥ २६ ॥
हे धूर्तपणाचीं कामें । राजकारण करावें नेमें ।
ढिलेपणाच्या संभ्रमें । जाऊं नये ॥ २७ ॥
कोठेंच पडेना दृष्टीं । ठाईं ठाईं त्याच्या गोष्टी ।
वाग्विळासें सकळ सृष्टी । वेधिली तेणें ॥ २८ ॥
हुंब्यासीं हुंबा लाऊन द्यावा । टोणप्यास टोणपा आणावा ।
लौंदास पुढें उभा करावा । दुसरा लौंद ॥ २९ ॥
धटासी आणावा धट । उत्धटासी पाहिजे उत्धट ।
खटनटासी खटनट । अगत्य करी ॥ ३० ॥
जैशास तैसा जेव्हां भेटे । तेव्हां मज्यालसी थाटे ।
इतुकें होतें परी धनी कोठें । दृष्टीस न पडे ॥ ३१ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
राजकारणनिरूपणनाम समास नववा ॥