Samas 5
समास 5 - समास पाचवा : स्वगुणपरीक्षा ( ड )
समास 5 - दशक ३
समास पाचवा : स्वगुणपरीक्षा ( ड )
॥ श्रीराम ॥
पुढें गेला विदेशासी । प्राणी लागला व्यासंगासी ।
आपल्या जिवेसीं सोसी । नाना श्रम ॥ १॥
ऐसा दुस्तर संसार । करितां कष्टला थोर ।
पुढें दोनी च्यारी संवत्सर । द्रव्य मेळविलें ॥ २॥
सवेंचि आला देशासी । तों आवर्षण पडिलें देसीं ।
तेणें गुणें मनुष्यांसी । बहुत कष्ट जाले ॥ ३॥
येकांच्या बैसल्या अमृतकळा । येकांस चंद्री लागली डोळां ।
येकें कांपती चळचळा । दैन्यवाणीं ॥ ४॥
येकें दीनरूप बैसलीं । येकें सुजलीं येकें मेलीं ।
ऐसीं कन्यापुत्रें देखिलीं । अकस्मात डोळां ॥ ५॥
तेणें बहुत दुःखी जाला । देखोनिया उभड आला ।
प्राणी आक्रंदों लागला । दैन्यवाणा ॥ ६॥
तंव तीं अवघीं सावध जालीं । म्हणती बाबा बाबा जेऊं घाली ।
अन्नालागीं मिडकलीं । झडा घालिती ॥ ७॥
गांठोडें सोडून पाहाती । हातां पडिलें तेंचि खाती ।
कांहीं तोंडीं कांहीं हातीं । प्राण जाती निघोनी ॥ ८॥
तांतडी तांतडी जेऊं घाली । तों तें जेवितां जेवितां कांहीं मेलीं ।
कांहीं होतीं धादावलीं । तेंहि मेलीं अजीर्णें ॥ ९॥
ऐसीं बहुतेकें मेलीं । येक दोनीं मुलें उरलीं ।
तेंहि दैन्यवाणीं जालीं । आपलें मातेवांचुनी ॥ १०॥
ऐसे आवर्षण आलें । तेणें घरचि बुडालें ।
पुढें देसीं सुभिक्ष जालें । आतिशयेंसी ॥ ११॥
लेकुरां नाहीं वाढवितें । अन्न करावें लागे आपुलेन हातें ।
बहु त्रास घेतला चित्तें । स्वयंपाकाचा ॥ १२॥
लोकीं भरीस घातलें । पुन्हां मागुतें लग्न केलें ।
द्रव्य होतें तें वेचलें । लग्नाकारणें ॥ १३॥
पुन्हां विदेशासी गेला । द्रव्य मेळऊन आला ।
तव घरीं कळहो लागला । सावत्र पुत्रांसी ॥ १४॥
स्त्री जाली न्हातीधुती । पुत्र देखों न सकती ।
भ्रताराची गेली शक्ती । वृद्ध जाला ॥ १५॥
सदा भांडण पुत्रांचें । कोणी नायकती कोणाचें ।
वनिता अति प्रीतीचें । प्रीतिपात्र ॥ १६॥
किंत बैसला मनां । येके ठाई पडेना ।
म्हणोनियां पांचा जणा । मेळविलें ॥ १७॥
पांच जण वांटे करिती । तों ते पुत्र नायेकती ।
निवाडा नव्हेचि अंतीं- । भांडण लागलें ॥ १८॥
बापलेकां भांडण जालें । लेंकीं बापास मारिलें ।
तंव ते मातेनें घेतलें । शंखतीर्थ ॥ १९॥
ऐकोनि मेळले लोक । उभे पाहाती कौतुक ।
म्हणती बापास लेक । कामा आले ॥ २०॥
ज्या कारणें केले नवस । ज्या कारणें केले सायास ।
ते पुत्र पितीयास । मारिती पहा ॥ २१॥
ऐसी आली पापकळी । आश्चिर्य मानिलें सकळीं ।
उभे तोडिती कळी । नगरलोक ॥ २२॥
पुढें बैसोन पांच जण । वांटे केले तत्समान ।
बापलेंकांचें भांडण । तोडिलें तेहीं ॥ २३॥
बापास वेगळें घातलें । कोंपट बांधोन दिधलें ।
मन कांतेचें लागलें । स्वार्थबुद्धी ॥ २४॥
कांता तरुण पुरुष वृद्ध । दोघांस पडिला संमंध ।
खेद सांडून आनंद । मानिला तेहीं ॥ २५॥
स्त्री सांपडली सुंदर । गुणवंत आणी चतुर ।
म्हणे माझें भाग्य थोर । वृद्धपणीं ॥ २६॥
ऐसा आनंद मानिला । दुःख सर्वही विसरला ।
तंव तो गल्बला जाला । परचक्र आलें ॥ २७॥
अकस्मात धाडी आली । कांता बंदीं धरून नेली ।
वस्तभावही गेली । प्राणीयाची ॥ २८॥
तेणें दुःख जालें भारीं । दीर्घ स्वरें रुदन करी ।
मनीं आठवे सुंदरी । गुणवंत ॥ २९॥
तंव तिची वार्ता आली । तुमची कांता भ्रष्टली ।
ऐकोनियां आंग घाली । पृथ्वीवरी ॥ ३०॥
सव्य अपसव्य लोळे । जळें पाझरती डोळे ।
आठवितां चित्त पोळे । दुःखानळें ॥ ३१॥
द्रव्य होतें मेळविलें । तेंही लग्नास वेचलें ।
कांतेसिही धरून नेलें । दुराचारी ॥ ३२॥
मजही वृद्धाप्य आलें । लेंकीं वेगळें घातलें ।
अहा देवा वोढवलें । अदृष्ट माझें ॥ ३३॥
द्रव्य नाहीं कांता नाहीं । ठाव नाहीं शक्ति नाहीं ।
देवा मज कोणीच नाहीं । तुजवेगळें ॥ ३४॥
पूर्वीं देव नाहीं पुजिला । वैभव देखोन भुलला ।
सेखीं प्राणी प्रस्तावला । वृद्धपणीं ॥ ३५॥
देह अत्यंत खंगलें । सर्वांग वाळोन गेलें ।
वातपीत उसळलें । कंठ दाटला कफें ॥ ३६॥
वळे जिव्हेची बोबडी । कफें कंठ घडघडी ।
दुर्गंधी सुटली तोंडीं । नाकीं स्लेष्मा वाहे । ३७॥
मान कांपे चळचळां । डोळे गळती भळभळां ।
वृद्धपणीं अवकळा । ठाकून आली ॥ ३८॥
दंतपाटी उखळली । तेणें बोचरखिंडी पडिली ।
मुखीं लाळ गळों लागली । दुर्गंधीची ॥ ३९॥
डोळां पाहातां दिसेना । कानीं शब्द ऐकेना ।
दीर्घ स्वरें बोलवेना । दमा दाटे ॥ ४०॥
शक्ती पायांची राहिली । बैसवेना मुरुकुंडी घाली ।
बृहती वाजों लागली । तोंडाच ऐसी ॥ ४१॥
क्षुधा लागतां आवरेना । अन्न समईं मिळेना ।
मिळालें तरी चावेना । दांत गेले ॥ ४२॥
पित्तें जिरेना अन्न । भक्षीतांच होये वमन ।
तैशेंचि जाये निघोन । अपानद्वारें ॥ ४३॥
विष्टा मूत्र आणि बळस । भोवता वमनें केला नास ।
दुरून जातां कोंडे स्वास । विश्वजनाचा ॥ ४४॥
नाना दुःखें नाना व्याधी । वृद्धपणीं चळे बुद्धी ।
तर्ह्हीं पुरेना आवधी । आयुष्याची ॥ ४५॥
पापण्या भवयाचे केंश । पिकोन झडले निःशेष ।
सर्वांगीं लोंबलें मांस । चिरकुटासारिखें ॥ ४६॥
देह सर्व पाअरिखें जालें । सवंगडे निःशेष राहिले ।
सकळ प्राणीमात्र बोले । मरेना कां ॥ ४७॥
जें जन्मून पोसलीं । तेंचि फिरोन पडिलीं ।
अंतीं विषम वेळ आली । प्राणीयासी ॥ ४८॥
गेलें तारुण्य गेलें बळ । गेलें संसारीचें सळ ।
वाताहात जालें सकळ । शरीर आणी संपत्ती ॥ ४९॥
जन्मवरी स्वार्थ केला । तितुकाहि वेर्थ गेला ।
कैसा विषम काळ आला । अंतकाळीं ॥ ५०॥
सुखाकारणें झुरला । सेखीं दुःखें कष्टी जाला ।
पुढें मागुता धोका आला । येमयातनेचा ॥ ५१॥
जन्म अवघा दुःखमूळ । लागती दुःखाचे इंगळ ।
म्हणोनियां तत्काळ । स्वहित करावें ॥ ५२॥
असो ऐसें वृद्धपण । सकळांस आहे दारुण ।
म्हणोनियां शरण । भगवंतास जावें ॥ ५३॥
पुढें वृद्धीस तत्वतां । गर्भीं प्रस्तावा होता ।
तोचि आला मागुता । अंतकाळीं ॥ ५४॥
म्हणौनि मागुतें जन्मांतर । प्राप्त मातेचें उदर ।
संसार हा अति दुस्तर । तोचि ठाकून आला ॥ ५५॥
भगवद्भहजनावांचुनी । चुकेना हे जन्मयोनि ।
तापत्रयांची जाचणी । सांगिजेल पुढे ॥ ५६॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
स्वगुणपरीक्षानाम समास पाचवा ॥ ५॥